०१४ पंढरीये चोख रूपडें अशेख
पंढरीये चोख रूपडें अशेख ।
भीमातीरीं देख पुण्यभूमी ॥ १ ॥
आदिपीठ देव ब्रह्म हें स्वयमेव ।
पुंडलिक भाव प्रगटला ॥ २ ॥
जन हें कोल्हाळ विठ्ठल तारक गोपाळ ।
कीर्तनीं कळीकाळ दूरी ठाये ॥ ३ ॥
नाम हें विठ्ठल नलगे पैं मोल ।
नित्यता सकळ पांडुरंग ॥ ४ ॥
त्रिविधताप पाप तें जिंतील अमूप ।
मुरतील संकल्प एक्या नामें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे धन्य कीर्तन जो करी ।
सर्वत्र चराचरीं बोलियेलें ॥ ६ ॥
सरलार्थ:
श्रीहरिचे नाम घेतले असता त्याचे स्पष्ट स्वरूप साक्षात दिव्यासारखे अंधार नाहिसे करणारे असून ते नाम सर्व लोकांचे पाप नाहिसे करते. ।।१।। विठ्ठलच सर्व रूपाने नटला आहे असे ते शोभिवंत रूप पाहून दिवसचे दिवस पंढरीत सेवा चालु आहे. ।।२।। नामाचे माधुर्य-गोडी अशी आहे की त्याने रजतमाच्या वृत्ति दूर होऊन एक सारखी राम कृष्ण चिंतनाचीच खूण शिल्लक राहते. ।।३।। संसार समुद्रातून तारणारा नावाडी विचार आहे व त्याचे सेवन सदैव पुंडलिक करीत आहे. ।।४।। सर्व विश्वाला तारलेले नाम पीक भरास आले आहे. त्यामुळे मनाचे संकल्प श्री विठ्ठल केशवातच रंगून गेले आहेत. ।।५।। निवत्ति हा विठ्ठलाचे सर्वांगाने सेवन करीत आहे त्यामुळे त्यास प्रत्येक दिवसाचे फळ आत्मारामाची प्राप्ति हेच आहे. ।।६।।
भावार्थ:
पुण्यभूमी पंढरी ज्या भीमातीरी वसली आहे तेथे सगुण रुपातील विठ्ठल रुप तुम्हाला पाहता येईल. पुंडलिकाच्या भक्तिभावामुळे पांडुरंग प्रगट झाला व त्यामुळे पंढरी हे आदि पीठ मानले जाते. इंद्रियाचा धनी असा तारक विठ्ठल जनातील कल्लोळ दुर सारतो व हे कीर्तनामुळे साध्य होते कीर्तनात कळीकाळालाही प्रवेश नसतो. जेथे श्री विठ्ठलाचा अखंड वास आहे तेथे कोणते ही मोल न देता नामसाधना होते. विठ्ठल नामामुळे त्रिविध ताप व अनेक पापे नष्ट होऊन संकल्प ही स्थिरावतात. निवृत्तिनाथ म्हणतात जो नामसंकीर्तन करतो तो धन्य आहे आशी सर्व चराचराची धारणा आहे.