२०० निजतेज बीज नाठवे हा देह
निजतेज बीज नाठवे हा देह ।
हरपला मोह संदेहेसी ॥ १ ॥
काय करूं कैसें कोठे गेला हरि ।
देहीं देहमापारीं हरि जाला ॥ २ ॥
विदेह पैं गंगा पारुषली चित्तीं ।
चिद्रूपीं पैं वृत्ति बुडोनि ठेली ॥ ३ ॥
गुरुलागिम भेटी निवृत्ति तटाक ।
देखिलें सम्यक् समरसें ॥ ४ ॥
चित्तवृत्ति धृति यज्ञ दान कळा ।
समाधि सोहळा विष्णुरूप ॥ ५ ॥
ज्ञानगाये हरिनामामृत ।
निवृत्ति त्वरित घरभरी ॥ ६ ॥
सरलार्थ:
आत्मप्रकाशाच्या रहस्याने हा देह आठवत नाही व मी देह हा मोहहि संशयासह नाहिसा झाला आहे ।।१।। मी आता काय व कसे करू ? तो हरि कोठे गेला? देहाच्याच ठिकाणी तो देहाचे माप घेणारा झाला आहे? विदेह मुक्तिची गंगा चित्तात प्राप्त झाली आहे व चित्स्वरूपांत वृत्ति बुडून राहिली आहे ।।३।। श्रीगुरुभेट हे निवृत्तिचे पैलतीर आहे व ते ऐक्यभावाने चांगले प्राप्त झाले आहे ।।४।। चित्ताची वृत्ति, धैर्य, यज्ञ, दान व कला कौशल्य व समाधी – (योगसाधना) सोहळा हे सर्व विष्णुस्वरूपच झाले आहे ।।५।। श्रीज्ञानदेव हे हरिनामामृत गाऊन माप करीत असून निवृत्ति ते हरिनाम आपल्या घरी जीवनांत साठवित आहे ।।६।।
भावार्थ:
आत्मारामाचे निजतेजाचे बीज देहात रुजले की मोह संदेह हरपून जातात. काय करु हा हरि कोठे गेला म्हणुन शोध सुरु केला तर तो हरि ह्या देहात देह म्हणुन सापडला. विदेही अवस्थेतील गंगा आत्मारामरुपी चित्त सागराला मिळाली व त्या एकत्वाच्या ठिकाणी सर्व वृत्ती तदाकार होऊन त्या गंगासागरात बुडाल्या. श्री गुरु गहिनीनाथ तलाव असुन मी त्या तलावाचा तट असुन तो तट व तलाव सम्यक दिसले की तलाव पूर्ण होऊन साकार होतो. चित्त, वृत्ती, धृती, यज्ञ दान ह्या कलानी समाधीस्थ होऊन त्या विष्णुरुपाशी एकरुप होता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, सतत त्याचे नाम ज्ञान पुर्वक गायन केल्यामुळे तो हरि वृत्ती रहित होऊन माझ्यात संपुर्ण भरुन राहिला आहे.