१५९ निज लक्षाचें लक्ष हरपलें भान

निज लक्षाचें लक्ष हरपलें भान ।
दिन मान शून्य जया माजी ॥ १ ॥
तें ब्रह्म गोजिरें गोपाळ संगती ।
संवगडे सांगाती भाग्यवंत ॥ २ ॥
वेणुवाद्यध्वनि यमुनाजळ स्थिर ।
ध्यानाचा प्रकार कृष्णरासी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तें स्वरूप सौख्य रूपडें ।
पाहाती चहूंकडे योगीजन ॥ ४ ॥

सरलार्थ:

जीवात्म लक्षाचे साध्य जे परब्रह्म असून त्या ठिकाणी आत्मभान-ज्ञान हि नाहिसे झाले असून सर्वकाळ तेथे शून्य – नाहिसा होतो ।। १ ।। ते मृदु-कोमल ब्रह्म या गोपाळांच्या संगतीत असल्याने संगतीचे सवंगडी गोपाळ भाग्यवान आहेत ।।२।। वेणु वाजत असता त्या आवाजाने यमुनेचे पाणी स्थिर आहे. हे अमाप कृष्णरूप ध्यान एकप्रकारे ध्यानच आहे ।।३।। ते स्वरूपसुख योगी लोक सर्व ठिकाणी पाहतात असे निवृत्तिनाथ म्हणतात. ।।४।।

भावार्थ:

जे स्वरुप काळ, स्थल, हुन परे आहे त्या निर्गुण परब्रह्माठायी योगी ज्याला आपले लक्ष मानतात त्या लक्षला विसरतात. तेच गोजिरे कृष्णपरब्रह्म आपले भाग्यवान सोबती गोपाळांबरोबर राहते. ज्या वेणुच्या वादनामुळे यमुनेचे जळ ही पांगुळते नव्हे नव्हे यमुनेलाही त्याचे ध्यान लागते. निवृतिनाथ म्हणतात, तेच कृष्णरुप नित्य सर्वत्र व्यापक, सुखरुप, ब्रह्मस्वरुप आहे त्यालाच योगी सर्व ठिकाणी पाहतात.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *