१७० प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा

प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा ।
न पवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥ १ ॥
अहिंसेचें स्वरूप हेंचि हरिरूप ।
न म्हणे हरि आप सर्व आहे ॥ २ ॥
नाहीं त्यांसि जय नुद्धरे सर्वथा ।
हरिवीण व्यथा कोण वारी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये ।
तेणें मार्गें पाहे हरि सोपा ॥ ४ ॥

सरलार्थ:

जो मायेला धरून बसला आहे व कल्पनेतच सदैव वावरतो तो कर्मजड मनुष्य श्रीहरिस केव्हाच प्राप्त होणार नाही ।।१।। अहिंसा हेच हरिचे स्वरूप आहे व आपणासह सर्व स्वरूपच आहे. असे जो म्हणत व मानतही नाही ।।२।। ज्याचा इहपरलोकी जय होणार नाही व त्याचा मुळीच उद्धार होणार नाही. हरिशिवाय दुःख कोण नाहिसे करणार आहे? ।।३।। श्री निवृत्तिनाथ म्हणतात तू सोपे असे श्रीगुरूचेच पाय धर. याच मार्गाने श्रीहरि हा सोपा व सुलभ होणार आहे ॥४॥

भावार्थ:

मी व माझे ह्या देह कल्पनेनुसार मार्गक्रमण करणारा कधीच वैकुंठाला प्राप्त होत नाही. तो अभक्त नुसते अहिंसेचे तत्व मानतो पण सर्व जग हे हरिने ओतप्रोत आहे हे मानत नाही त्याला कधी ही जय व यश प्राप्त होत नाही. कारण हरिच सर्वसामर्थ्यशाली मदत आहे व तोच तारणारा आहे. निवृतिनाथ म्हणतात, ज्यांने गुरुचरणाचा आश्रय त्याच्यासाठी हरिप्राप्तीचा मार्ग सोपा आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *