१७२ आदिनाथ उमाबीज प्रकटिलें
आदिनाथ उमाबीज प्रकटिलें ।
मछिंद्रा लाधली सहजस्थितीं ॥ १ ॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।
पूर्ण कृपा केली गयनिनाथा ॥ २ ॥
वैराग्यें तापला सप्रेमें निवाला ।
ठेवा जो लाधला शांतिसुख ॥ ३ ॥
निर्द्वद्व निःशंक विचरतां मही ।
सुखानंद ह्रदयीं स्थिर जाला ॥ ४ ॥
विरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख ।
देऊनि सम्यक अनन्यता ॥ ५ ॥
निवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण ।
कूळ हें पावन कृष्णनामें ॥ ६ ॥
सरलार्थ:
आदिनाथ भगवान शंकर व उमापार्वती माता यांच्यातून हे हरिनाम बीज प्रगट झाले. ते मच्छिंद्रनाथास सहजच प्राप्त झाले ।।१।। तीच हरिनामाच्या प्रेमाची खूण-वर्म त्यांनी आपला शिष्य गोरक्षनाथ यांस दिली. व गोरक्षांनी गहिनीनाथावर पूर्ण कृपा केली ||२|| वैराग्याच्या ज्वाळांनी तापलेला व भक्ति प्रेमाने शांत झालेल्या व शांती सुखाचा ठेवा ज्यास सापडला तो ।।३।। गहिनीनाथ पृथ्वीवर भ्रमण करीत सुखदुःखादि व संशय रहित होऊन फिरत असता सुखस्वरूप आनंदकंद श्रीहरि हृदयात स्थिर झाला ।।४।। अशा त्या गहिनीनाथाने विरक्तियुक्त व अन्वय बोध योग्य व सद्गुरूस यथायोग्य अनन्यभाव देणाऱ्या ||५|| निवृत्तिनाथावर पूर्ण कृपा केली व नाथ संप्रदायाचे कुळ कृष्णनामाने पावन केले आणि पवित्र केले ।।६।। (तशी कृष्णभक्ती निवृत्तीनाथांच्या कुळात आजी निराईपासून गहिनीनाथद्वारे होतीच)
भावार्थ:
आदिनाथ शंकराकडुन पार्वती ज्ञान ऐकत असताना त्या क्षिरसागरात सहजस्थितीत असणाऱ्या मछिंद्रनाथाना लाभ झाला. तीच प्रेमनाममुद्रा मछिंद्रनाथानी गोरक्षनाथांना दिली व गोरक्नाथांकडुन ती कृपा गहिनीनाथांना ती प्राप्त झाली. ज्यांच्या कडे धगधगीत वैराग्य आहे. व त्यांच्या हृदयात प्रेम आहे त्यांना शांती सुखाचा ठेवा प्राप्त होतो. ज्याच्या कडे कोणते ही द्वैत नाही व त्याला कोणतीही त्याच्या स्वरुपाबद्दल शंका नाही व जो सतत पृथ्वीवर फिरत राहुन जनांवर कृपा करतो त्याच्या हृदयात तो सुखानंद परमात्मा वास करतो. जो पुर्ण विरक्त आहे व वेदांना शरण जाऊन जो वेदोक्त मुखाने करतो त्याला तो परमात्मा सम्यक व अन्यन ज्ञान प्रदान करतो. निवृतीनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांनी कृपा करुन हे गुह्य ज्ञान मला दिल्याने माझे कुळ पावन झाले आहे.