१८७ चराचरीं हरि गुरुमुखें खरा

चराचरीं हरि गुरुमुखें खरा ।
माजि ब्रह्म सैरा विचरों आम्हीं ॥ १ ॥
आम्हां ऐसें व्हावें तरीच हें भोगावें ।
निरंतर ध्यावें पोटाळूनि ॥ २ ॥
नाहीं येथें काळ अवघे शून्यमये ।
निर्गुणी सामाये तुन माझी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणें परत्रिंकूटगोल्हाट ।
त्यावरील नीट वाट माझी ॥ ४ ॥

सरलार्थ:

चराचर विश्वामध्ये ब्रह्मस्वरूप श्रीहरि आहे हा सत्य बोध गुरुमुखातून झाल्याने आम्ही त्यांत स्वच्छंदाने विहार करू ।।१।। आम्ही असे झालो तरच हे आत्मसुख भोगता येईल व सतत त्यास पोटाशी धरता येईल. ।।२।। येथे कोणताही काळ वेळ नाही सर्व शून्यच आहे. माझा देह हा निर्गुणस्वरूपच झाला आहे ।।३।। श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात-इडा, पिंगला व सुषुम्ना या तीन नाड्यांच्या पलिकडे जे प्राण वायुचे ठिकाण त्या वरची माझी सरळ वाट आहे ॥४॥

भावार्थ:

ह्या चराचरात हरि भरल्याचे स्वतः गुरु गहिनीनाथानी सांगितले असल्याने त्या ब्रह्म स्वरुपा बरोबर स्वछंदाने फिरत असतो. आम्हा आत्मस्वरुपाने ब्रह्मरुप झाल्याने त्या ब्रह्म स्वरुपाला भोगत असतो व ते आत्म स्वरुप व ब्रह्मस्वरुप एकच झाल्याने एकमेकाला पोटाळुन असल्यासारखे वाटते. ते ब्रह्म स्वरुप शुन्यमय असल्याने शुन्याला कालाचे परिमाण नाही म्हणुन आम्ही देहासह त्या शुन्य स्वरुप ब्रह्मात एकरुप असतो. निवृतिनाथ म्हणतात, आकार मात्रेने झालेला स्थूल देह, उकार मात्रेने झालेला सुक्ष्म देह व मकार मात्रेने झालेला कारण देह वरिल टिंब म्हणजे महाकारण देह ही ओमकाराची रचना आहे. मी ह्या त्रिकुट गोल्हाटाचे म्हणजेच ॐचे ध्यान केल्याने मी ब्रह्म रुपाशी एकरुप झालो आहे. व हाच सरळ मार्ग आहे स्वस्वरुपाची खुण पटवण्याचा.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *