२६४ प्रल्हाद परिक्षिती ध्रुव बाळ म्हणती
प्रल्हाद परिक्षिती ध्रुव बाळ म्हणती । उपमन्यागति क्षीरसागरीं ।। १ ।।
भक्त हे तरले नामाचेनि बळें । कळिकाळासी खेळे दों अक्षरीं ।। २ ।।
आदि अंबऋषी भक्त निजसखा। दो अक्षरी लेखा केला तेणें ।। ३ ।।
उद्धव अक्रूर आणि तो विदुर । दों अक्षरी पार उतरले ।। ४ ।।
हनुमंत दास रामनामें उदास । कळिकाळासी भाष सांगतसे ।। ५ ।।
द्रौपदी सुभद्रा गोपाळ गोपिका बळीभद्र सखा दों अक्षरीं ॥ ६ ॥
नंद तो वसुदेव उग्रसेन राजा । यादव पै पैंजा दों अक्षरीं ॥ ७ ॥
निवृत्ति म्हणे अक्षर दोनी रामनाम । जपतां पावे स्थान वैकुंठीचे ॥ ८ ॥
सरलार्थ:
प्रल्हाद, परिक्षिती, ध्रुव बाळ, म्हणून जे भक्त आहेत त्यांना व उपमन्युस क्षीरसागराची प्राप्ति झाली. ॥ १ ॥ हे सर्व भक्त नामाच्याच बळावर संसार समुद्रातून तरले व हरि या दोन अक्षरानेच त्यांनी कळिकाळा बरोबर दोन हात केले ||२|| तो आत्ममित्र आद्य अंबऋषी – अंबरीष त्यानेही हरि या दोन अक्षरानेच काळाचे माप केले. ॥३॥ तसेच तो उध्दव, अक्रूर आणि विदून हे त्या दोन अक्षरानेच पलिकडे गेले ||४|| दासमारूतीने हि विरक्त होऊन रामनामाने कळिकाळा बरोबर प्रतिज्ञा- घेतली ॥५॥ द्रौपदी, सुभद्रा, गोप आणि गोपिका व तो सखा बळीरामही हरि या दोन अक्षरानेच श्रीकृष्णरूप झाले || ६ || नंद, वसुदेव व राजा उग्रसेनहि आणि यादवांनीहि या दोन अक्षरानेच पैज जिंकली ॥७॥ निवृत्तिनाथ महाराज ती दोन अक्षरे म्हणजे राम अथवा हरि यांचा जप केला असतां वैकुंठाचे ठिकाण प्राप्त होते असे म्हणतात ।।८।।